भाजप नेत्यांना दारातही उभं करू नका, शरद पवार यांचे शेतक-यांना आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/sharad-pawar-stage.jpg)
पुणे | महाईन्यूज
निवडणुकीत भाजपचे नेते मतं मागण्यासाठी तुमच्या घरी येतील. त्यांना तुमच्या दारातही उभं करू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागरिकांना आवाहन केले. अहमदनगर येथील सभेत त्यांनी भाषण करताना महायुतीवर शरसंधान साधले.
शेतकरी आणि शेती यांच्याबाबत भाजपाला काहीही आस्था नाही. त्यामुळे त्यांना दारात उभंही करु नका. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची वेळ आली तेव्हा कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेणारं हे सरकार आहे. त्यांना मतं देऊ नका, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
या सरकारने शेतकरी आणि उद्योगांचे मोठे नुकसान केले. सरकारच्या धोरणामुळे अनेक कारखाने बंद पडले. लोकांचे रोजगार गेले, असं म्हणत शरद पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांवरही टीका केली. पक्ष बदलणाऱ्यांची मला चिंता नाही, आमचीही त्यांच्यापासून सुटका झाली, असा टोला शरद पवार यांनी लगावला.