‘फास्टॅगमधील गोंधळ कायम, ‘टोलचालकांकडून फास्टॅगमध्ये लूट’
![Petition in Mumbai High Court against 'Fastag' compulsion](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/fasttag-1.jpg)
पुणे|महाईन्यूज|
‘फास्टॅगची योजना टोलचालकांचे कुरण ठरत असून, काही टोल नाक्यांवर परतीची (रिटर्न) सवलत न देता दोन्हीकडून लूट सुरू आहे,’ असा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केला आहे.
पुण्यातून मुंबई, तसेच कोल्हापूरपर्यंत दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. मात्र, फास्टॅग रिटर्नमध्ये सवलत न देता, त्यांच्याकडून पूर्ण रक्कम वसूल केली जात असल्याची नाराजीही ग्राहक पंचायतीने व्यक्त केली आहे.
टोलवसुली सोयीची व्हावी, चालकांची कोंडीतून सुटका होऊन वेळेची बचत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘फास्टॅग’ योजना सुरू केली. मात्र, यासंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाची कोणतीही यंत्रणा नाही. केवळ हेल्पलाइनवर तक्रार नोंदवा, इतकेच उत्तर दिले जात आहे, अशी तक्रार ग्राहक पंचायतीने केली आहे.
ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक या संदर्भात म्हणाले, ‘फास्टॅगमधील गोंधळ कायम असून, त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. अनेक टोलनाक्यांवर फास्टॅग स्कॅन होत नसल्याचे तेथील कर्मचारी सांगतात, त्यामुळे ते वाहनचालकांकडून रोख स्वरूपात टोल आकारतात. अनेकदा एकाच टोलनाक्यावर दोनदा टोल आकारणी होते, फास्टॅग स्कॅन होत नाही, किंवा स्कॅनिंगला विलंब होतो, अशा तक्रारी वाहनचालक करतात.’