पैसे आले खूप म्हणून अक्कल येत नसते…, आमदार आव्हाडांची खासदार काकडेंवर टिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/jitendra-awhad-sanjay-kakde.jpg)
पुणे, महाईन्यूज
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काकडेंचा खरपूस समाचार घेतला आहे. पैसे आले खूप म्हणून अक्कल येत नसते, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. अजित पवार यांची पत्रकार परिषद म्हणजे नाटक, अशी टिका काकडे यांनी केली होती.
‘संजय काकडे पैसे खूप आले म्हणून अक्कल येत नसते. पैसे कुणामुळे आले…. पैसे कुणी दिले… कुणी मदत केली.. विसरले कृतघ्न काकडे…’ अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी संजय काकडे यांचा समाचार घेतला.
आव्हाड यांनी आर्थिक गुन्हेगारी विभागाच्या FIR ची प्रत ट्वीट केली आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते केंद्रीय मंत्री होते, इतर अनेक जणांचा उल्लेख आहे, पण त्यांचा नाही, आणि ईडी आम्ही आर्थिक गुन्हेगारी विभागाच्या FIR च्या आधारावर आमचा ECIR नोंदवल्याचं म्हणते, असं ट्वीट आव्हाडांनी केलं आहे. शरद पवारांना बदनाम करण्यासाठी विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आव्हाडांनी केला.
संजय काकडे यांनी केली अजित पवारांवर टीका
अजित पवारांची पत्रकार परिषद ही नाटकबाजी आहे. पवारांनंतर नेतृत्व कुणाचं? हा खरा वाद आहे, अशी टीका काकडेंनी केली. काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं. केवळ सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे, असं संजय काकडे म्हणाले. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे.
शालिनीताई पाटील यांचे तीन कारखाने कचरा भावाने विकले. त्यावेळी 350 कोटींचा कारखाना कवडीमोल भावाने 35-40 कोटींना विकला. जयंत पाटलांनी औरंगाबादचा कारखान्यात कमी किमतीत घेतला, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखाने यांच्याच (राष्ट्रवादी) नेत्यांनी विकत घेतले, असा आरोपही संजय काकडे यांनी केला होता.
अजित पवारांचं तांडव करून पक्षातील नेतृत्वाचं भांडण आहे. शरद पवारांनंतर कोणाचं नेतृत्व यावरून हा वाद चाललाय. शरद पवारांनी कुठे तरी हा कारखाना या माणसाला विका, किंवा मालमत्ता किंमत कमी करा, असं काहीतरी आढळून आलं असेल, त्यामुळे गुन्हा दाखल असेल. त्यामुळे अस्थिर होण्याची गरज नाही, असंही संजय काकडे म्हणाले होते.
अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि ते गायब झाले होते. नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
माझ्या सदसदविवेकाला जागून मी राजीनामा दिला. या निर्णयाने पक्षातील अनेकांची मने दुखावली गेली. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा झाला तेव्हाही असंच झालेलं होतं. मी जर कुणालाही सांगितलं असतं तर त्यांनी मला निर्णय घेऊ दिला नसता. मने दुखावली म्हणून मी त्यांची माफी मागतो, असं अजित पवार म्हणाले होते.