पुण्यासह पिंपरी-चिंचवडची पाण्याची गरज भागविण्यासाठी मुळशी धरण एकमेव पर्याय
![Ajit Pawar cancels decision to spend Rs 6 crore on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ajit-pawar.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पुणे व पिंपरी चिंचवड शहराला वाढत्या लोकसंख्येसोबत पाण्याची गरज देखील वाढत आहेत. परंतु यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र धरण बांधण्यासाठी एकही साईट शिल्लक नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी टाटाचे मुळशी धरण हाच एक पर्याय असून, या संदर्भांत चर्चा सुरु आहे, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले.
पुणे विभागातील सर्व जिल्ह्याचा सन २०२०-२१ या वर्षांचा जिल्हा नियोजना संदर्भांत आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, पाण्यावर होणार खर्च लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र धरण बांधलेले परवडेल. याबाबत पवार म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्यात काम करतोय. पण पुणे जिल्ह्यात धरणासाठी एकही साईड शिल्लक नाही. त्यामुळे नवे धरण बांधणे शक्यच नाही. यासाठी केवळ मुळशी धरणाचा पर्याय आहे. परंतु या धरणाच्या पाण्यावर प्रामुख्याने वीज निर्मिती केली जाते. शासनाने पाण्या संदर्भांत धोरण निश्चित आहे. यामध्ये प्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून, नंतर शेती आणि नंतर औद्योगिक वापरासाठी आहे. यामुळे मुळशी धरणातील पाणी शहरांची पाण्याची गरज भागविण्यासाठी वापरता येऊ शकते, असे पवार यांनी येथे सांगितले.