breaking-newsपुणे

पुण्यात दोन कोटीच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

पुणे : एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी अवघ्या 6 तासात मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीकडून दीड कोटीची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर गाडी आणि दुचाकी असा 1 कोटी 75 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अजय बाळासाहेब साबळे(वय-24), सुजित किरण गुजर(वय-24), ओंकार श्रीनाथ वाल्हेकर(वय-20)असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील अजय साबळे हा मुख्य सूत्रधार आहे. तर याच गुन्ह्यातील अमीत पोपट जगताप(वय-20)हा फरार आहे. त्यांनी कांतीलाल गणात्रा(वय-65 रा. सिटी पार्क सोसायटी, मार्केट यार्ड)या व्यापाऱ्याचे अपहरण केले होते.

कांतीलाल गणात्रा हे गुरुवारी रात्री घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचे फॉच्युनर कारमधून अपहरण केले. प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका नागरिकाने घटनेची माहिती तत्काळ नियंत्रण कक्षाला दिली. या माहितीच्या आधारे मार्केटयार्ड पोलिसांनी गणात्रा यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याच दरम्यान आरोपींनी कांतीलाल गणात्रा यांच्या मोबाईलवरुन मुलाला फोन करुन 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पोलिसांना माहिती सांगितल्यास गणात्रा यांना ठार मारण्याची धमकी दिली. खंडणीची रक्कम घेऊन चांदणी चौकात घेऊन येण्यास सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी चांदणी चौकात आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. यावेळी पैसे स्वीकारताना सुजीत गुजर आणि ओंकार वाल्हेकर या दोघांना अटक केली. मात्र, मुख्य सुत्रधार अजय साबळे आणि अमित जगताप हे खंडणी देण्यासाठी आणलेली दीड कोटीची रक्कम घेऊन फॉच्युनर गाडीतून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली आणि शोध घेऊन अजय साबळे याला अटक केली. आरोपींनी पैसे मिळाल्याची खात्री झाल्यानंतर कांतीलाल गणात्रा यांना खेड शिवापूर येथील शिंदेवाडी येथे सोडून दिले. आरोपींकडे चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button