पुण्यातील सारस बागेच्या गेटवर भाजपचं घंटानाद आंदोलन सुरू
मुंबई – राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही धार्मिक स्थळे सुरू केली नाहीत. त्यामुळे अनेकांनी मंदिरे सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे खुली करण्याकरता भाजपकडून आज दार उघड उद्धवा दार उघड अशी हाक देत राज्यभर घंटनाद आदोलनाचं आयोजन केलं आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधून आंदोलनाचा श्रीगणेशा करण्यात आला. मुसळधार पावसातही संग्रामपूरच्या जगदंबा मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून घंटनाद आंदोलन करण्यात आलं.
कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यातच देशभरातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती.त्यानंतर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने मंदिरे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, राज्यातील वाढता संसर्ग लक्षात घेता मंदिरे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे अनेक धार्मिक संस्थानच्या वरिष्ठांनी सरकारकडे विनंती. मात्र, अद्यापही मंदिरे सुरू करण्यात आली नाहीत.
लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप अध्यात्मिक समन्वय आघाडीने केला आहे. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी आहे. अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळ, वारकरी महामंडळ, अखिल भारतीय पुरोहित संघ, जय बाबाजी भक्त परिवार यांसह वारकरी, महानुभाव, लिंगायत, जैन, शीख संप्रदायाच्या अनेक संप्रदायांची प्रमुख मंदिरे, गुरुद्वारा, जैन मंदिरे-स्थानक, बौद्ध विहार यांच्या प्रवेशद्वारांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.