पुण्यातील कोरोनाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी अजित पवारांनी थेट मुंबईच्या आयुक्तांनाच पुण्यात केलं पाचारण
मुंबईत काही प्रमाणात का होईना कोरोनाचं प्रमाण हे कमी होताना दिसत आहे.मात्र पुण्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी थेट मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह यांना पुण्यात पाचारण केलंय. आणि इथल्या अधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत कोरोना नियंत्रणात कसा येईल याचे प्रयत्न करायला सांगितले आहे.
कोरोना नियंत्रणाच्या मुंबईतील अनुभवाच्या आधारावर इक्बाल सिंह चहल यांनी पुणे प्रशासनाला या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजारांवर गेली आहे.
मागील दोन दिवसांत रुग्ण वाढीमध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकलंय. १५ जुलै ला मुंबईत १३९० तर पुण्यात १४१६ रुग्णांचे निदान झाले. १६ जुलै ला ही संख्या १४९८ आणि १८१२ अशी होती. अशा परिस्थितीत पुण्याने मुंबईच अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. शहरासह जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करून कामात गतिमानता आणण्याची गरज इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलीय.
पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्येक शनिवारी आढावा बैठक घेत आहेत. उपाययोजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. असं असताना रुग्ण संख्या वाढण्याबरोबरच रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये सुधारणा करण्याची तंबी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिलीये.