पुणे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सरासरीत तब्बल दहा पटीने वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/RICE.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्यात यंदा खरीप पिकांच्या क्षेत्रात सरासरी तब्बल दहा पटीने वाढ झाली आहे. गतवर्षी आतापर्यंत सरासरी 12 हजार 239 हेक्टरवर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा यामध्ये मोठी वाढ होऊन तब्बल 2 लाख 30 हजार 468 हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या झाल्यात.
संपूर्ण जुलै महिना पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील भाताची पुर्नलागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. परंतु जून महिन्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात प्रथमच बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झालेली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात तब्बल दहा पट्टीने वाढ झाली आहे. यंदा जून महिन्यात सर्वच तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने आतापर्यंत सरासरीच्या 125 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात सुमारे 1 लाख 84 हजार 274 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या होतात. परंतु जून महिन्याच्या चक्रीवादळात संपूर्ण जिल्ह्यातच चांगला पाऊस झाला आणि 2 लाख 30 हजार 468 हेक्टरवर पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना झाला आहे. तसेच यंदा अनेक वर्षांनंतर रब्बीच्या तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बाजरी, तूर, मूग उडीद आणि सोयाबीनची लागवड झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात खरीपाच्या लागवडी क्षेत्रात वाढ झाली आहे.
पावसाने ओढ दिल्याने भाताची पुनर्लागवड लांबणीवर गेली आहे. पुणे जिल्ह्यात भाताचे सरासरी लागवड क्षेत्र 57 हजार 964 हेक्टर ऐवढे आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 20 हजार 743 हेक्टर क्षेत्रावरच भाताची पुर्नलागवड झाली आहे.