पीक विम्याचे पैसे न दिल्याने शिवसेनेची विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड
पुणे। प्रतिनिधी । महाईन्यूज ।
पीक विमा घेऊनही संबंधित विमा कंपन्या शेतकऱ्यांना तो देत नाहीत. कष्टकरी शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा हा अपमान आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना विमा कंपन्या हयगय करत आहेत, असा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांनी बुधवारी मंगलदास रस्त्यावरील ‘इफ्को टोकियो’ विमा कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली. ‘हा केवळ ट्रेलर आहे, खरा सिनेमा पुढे दिसेल’, असा इशाराही सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांना पीकविमा वेळेवर न देणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधात सेना राज्यभर आंदोलन करेल, असेही सेनेच्या वतीने सांगण्यात आले.
विमा कंपन्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पीकविमा द्यावा. कंपन्या केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. एका कंपनीच्या कार्यालयाचे नुकसान करून आम्ही कंपन्यांना इशारा दिला आहे. यावरून बोध घेत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे लगेच द्यावेत, अन्यथा राज्यातील अन्य कंपन्यांच्या कार्यालयांचीही अशीच अवस्था करू. अशा शब्दांत शिवसैनिकांनी कंपन्यांना इशारा दिला आहे. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले,’विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत. ते त्यांना मिळायलाच हवेत. त्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिले होते.तेव्हा पैसे वेळेत दिेले जातील, असे आश्वासन कंपन्यांनी दिेले होते पण शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे शिवसैनिकांना हे पाऊल उचलावे लागले आहे.
शिवसेना कार्यकर्त्यांनी बुधवारी पुण्यातील मंगलदास रस्त्यावरील ‘इफ्को टोकियो’ विमा कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली. तसेच त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा या वेळी दिला.