पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे । प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
येथील ‘व्हीव्हीआयपी’ सर्किट हाऊस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह (व्हिसीव्दारे), सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर (व्हिसीव्दारे), जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही मार्गांची कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण होतील, असे नियोजन करावे. एखादा प्रकल्प काही कारणांमुळे लांबला तर खर्चात वाढ होते. या दोन्ही मार्गांचे भूसंपादन आणि मावेजा वाटप करण्यात यावे. आवश्यकता भासल्यास विभागीय आयुक्त राव यांनी वेगळी बैठक घेऊन विषय मार्गी लावावा, असे आदेशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.
बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषद निधी नावीन्यपूर्ण योजनेतून 50 टक्के अनुदानावर बैलजोडी लोकार्पण करण्यात आले. विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामासंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी, या दोन्ही मार्गांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव तसंच पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. pic.twitter.com/RosnbFSyXy
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2021