दौंडमध्ये ताणतणाव
दौंड – दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आल्यामुळे तालुक्यात आज संपूर्ण दिवस ताणतणावचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रीय समाज पक्षासह अन्य पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही याचा निषेध केला असून आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जोरदार मागणी करण्यात आली आहे. आज, दिवसभर दौंड शहर तसेच तालुक्यात विविध ठिकाणी सभा घेत संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी करणारी निवेदन तहसीलदारांना देण्यात आली आहेत.
दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट सोमवारी (दि.1) उघडकीस आल्यानंतर तालुक्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी यवत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. परंतु, आमदारांच्या खुना सारख्या गंभीर गुन्ह्याची तयारी करण्यात आल्याने पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. या कामी यवत पोलीसांच्या विशेष पथकासह दहशतवाद विरोधी पथकानेही (एटीएस) तपासाला सुरूवात केली असल्याचे सांगण्यात आले.
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे सत्ताधारी भाजपचा घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आर्थिक स्थिती चांगली असल्याच्या कारणातून कर्जमाफी नाकारणारे शेतकरी म्हणून आमदार कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधले होते. त्यानंतरच्या मंत्रिमंडळ विस्तारातही मंत्रीपद नको परंतु, शेतकऱ्यांच्या हिताकरिता भिमापाटस कारखाना सुरू करण्याकरिता विशेष निधी द्या, अशी मागणी करणाऱ्या कुल यांनी मुख्यमंत्र्यांच्या पंचसुत्रीमध्ये स्थान मिळवले. त्यामुळे अशा आमदाराच्या खुनाचा कट उघडकीस आल्यानंतर यामध्ये गृळमंत्री, मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या. यामुळेच यंत्रणा तातडीने कामाला लागली, यातून यवत पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेत, या कटाचा पर्दाफाश केला आहे.
…नेमके कारण काय?
लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. दौड मतदार संघाचा विचार करता या ठिकाणी नेहमीच दुरंगी, तिरंगी राजकारण होत आहे. त्यातच दौंड तालुका हा वाळू उपशाचे मोठे केंद्र बनला आहे. शिवाय यातून होणारी गुन्हेगारीचे प्रमाणही मोठे आहे. यानुसार या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे. याच शोध पोलीस घेत आहेत. याकरिता यवत पोलीसांनी विशेष पथक तयार केली असून ताब्यात घेण्यात आलेल्यांचीही कसून चौकशी केली जात आहे. शिवाय, दोघा आरोपींची नार्को टेस्ट घेण्याबाबतचा पर्यायही पोलीसांनी राखून ठेवला असून याचा तपास तातडीने करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आल्याचे सांगण्यात आले.