डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘कोव्हिड १९’ – ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार संपन्न
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
लॉक डाऊनचे पालन करीत रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘कोव्हिड १९ – ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनार संपन्न झाले.
महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग, शारीरिक शास्त्र विभाग आणि ग्रंथालय विभागामार्फत हे वेबिनार घेण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ सर उपस्थित होते.
कोव्हिड १९ – मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कोरोना या साथीच्या रोगाच्या अगोदरही समाजात अनेक समस्या आल्या होत्या. विविध प्रकारची महायुद्धे, दुष्काळ, त्सुनामी, भूकंप, महापूर आणि वादळे इतर समस्यांमधून माणूस मुक्त होऊन सक्षम झाला होता. आता कोरोना या संसर्गजन्य रोगामधूनही तो लवकर बाहेर पडेल. पण सध्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्याला सर्व गोष्टी जागेवर थांबल्यामुळे, आपल्या मनात नैराश्याची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिक प्रतिकारशक्ती वाढवायला पाहिजे. आता आपण घरी बसून आराम करीत आहोत. पण आपल्या जीवनात सुख आणि आनंद नाही. कोरोना या साथीच्या रोगामुळे आपल्या मनात चिंता आणि भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे मनावरील ताण-तणाव वाढला आहे.
आपल्या मनात एकाकीपणाची भावना निर्माण झाल्यामुळे आपल्याला झोप न येणे, भूक न लागणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. अशावेळी आपण मनाची ताकद वाढवायला पाहिजे. या परिस्थितीशी आपण समायोजन करायला हवे. आपला वेळ आवडत्या कामात घालवायला हवा. घरातल्यांशी आणि मित्रांशी संवाद करायला पाहिजे. सकारात्मक दृष्टीने जीवनाकडे पहायला हवे. दररोज चांगल्या विचारांची प्रार्थना करावी. तसेच आपल्यातील क्षमतेनुसार सर्व प्रसंगांना सामोरे गेल्यास आपण कोरोना या साथीच्या रोगातून लवकर मुक्त होऊ. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननिय प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, कोरोना या साथीच्या रोगामुळे संपूर्ण जग मानसिकदृष्ट्या विकलांग झाले आहे. त्यामुळे सर्व समाजाला मानसिक बळ देण्याच्या हेतूने ‘कोव्हिड १९- मानसिक ताण-तणावाचे व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. मानसिक स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःला आवडणाऱ्या कलेत गुंतवायला पाहिजे. त्यामुळे आपल्या मनात जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टी प्राप्त होईल. सकारात्मक दृष्टिकोन हा माणसाला जगण्याचे नवे बळ देतो. त्यामुळे एक दिवसीय राज्यस्तरीय वेबिनारमुळे अनेकांना जगण्याचे नवे बळ मिळेल. असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
सूत्रसंचालन ग्रंथालय विभागप्रमुख प्रा. एकनाथ झावरे, प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख प्रा. बी. एस. पाटील, पाहुण्यांची ओळख मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. तानाजी हातेकर यांनी तर कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. एकदिवसीय राज्यस्तरीय वेबिनारसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयातील २५४ संशोधक अभ्यासकांनी सहभाग घेतला होता.