जनतेचे आभार मानताना खासदार डाॅ.अमोल कोल्हेंना अश्रू अनावर झाले
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार
पुणे |महाईन्यूज|
झी मराठीची लोकप्रिय मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे. झी टीव्हीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला. ज्यात मुघल सैन्य आणि मुकर्रब खाननं छत्रपती संभाजी राजेंना कैद करून घेऊन जात असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मागच्या आठवड्याच्या टीआरपी लिस्टमध्ये ही मालिका चौथ्या स्थानावर होती. लवकरच ही मालिका संपणार आहे. मात्र या मालिकेची जागा कोणती मालिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शेवट गोड व्हावा म्हणुन आज स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेची संपुर्ण टिम छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भुमी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे शुक्रवारी सायंकाळी नतमस्तक झाली. यावेळी मागील सात ते आठ वर्षापासुन या मालिकेचा संघर्ष कसा घडला हे सांगताना अभिनेता व खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे डोळे भरुन आले. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भुमी असलेल्या वढू बुद्रुक, येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.
गेल्या दोन वर्षापासुन प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेचा शेवट जवळ आल्याचं दिसून येत असून, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले. जनतेचे आभार मानत काही चुकलं,राहिलं असेल तर माफ करा असे म्हणताना अमोल कोल्हेंना यावेळी अश्रू अनावर झाले.
दरम्यान मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास मांडला तो तसाच पुढील ३५० पेक्षा जास्त वर्ष माणसांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास अभिनेता डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.