गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय ही काळाची गरज – डॉ. विश्वंभर चौधरी
पिंपरी- घटना समितीचे पूर्ण श्रेय बाबासाहेबांना द्यायलाच हवे. यापूर्वीच्या सरकारने टेकड्या आणि भूखंड विकले; तर आताचे सरकार नद्या आणि समुद्र विकायला निघाले आहे. त्यामुळे गांधी, नेहरू, पटेल, सुभाषबाबू, आंबेडकर यांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांची बदनामी सहन न करता गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय ही काळाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ.विश्वभंर चौधरी व्यक्त केले.
चिंचवड येथे जयभवानी तरुणमंडळ आणि कालीमाता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत ‘याचसाठी केला होता अट्टाहास? ( स्वातंत्र्य चळवळ आणि आजचा भारत ) या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना डॉ.विश्वंभर चौधरी बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी राजाभाऊ गोलांडे होते; तसेच नगरसेविका मीनल यादव, मनीषा महाजन, सुप्रिया सोळांकुरे, छाया देसले, सुभाष पागळे, जालिंदर काळभोर, शंकर काळभोर, गणेश दातीर-पाटील, मानव कांबळे आदी उपस्थित होते.
डॉ.विश्वंभर चौधरी म्हणाले की, “देशात यापूर्वी कधी नव्हती एवढी धार्मिक भावना उफाळून आलेली आहे. सोशल मीडियामधून मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, अशी हाकाटी सुरू आहे; पण नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस हे फक्त पाच वर्षांचे भाडेकरू असून सामान्य माणूस हाच खरा देशाचा मालक आहे. त्यामुळे भयग्रस्त होण्याचे कारण नाही. द्वेषभावना वाढीस नेऊन देशाला पुढे जाऊ द्यायचे नाही, असेच सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. कधीही न बोलणारे डॉ.मनमोहनसिंग हेदेखील टीकात्मक बोलायला लागले इतकी सध्याची परिस्थिती वाईट आहे. खरं म्हणजे प्रत्येक देशाला संस्कृती आणि परंपरा असते त्यामुळे त्याचे अवडंबर माजवण्याची गरज नाही. वास्तविक जगात एकही धर्म आणि जात शुद्ध नाही तर सर्वच संकरित असून हे वैज्ञानिक सत्य आहे; पण आताच्या सरकारला धर्म, परंपरा पाहिजे, मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन नको आहे. अनिल जाधव, राहुल साळुंखे, कैलास केसवड, गोरख देवकाते, अभिजित भापकर यांनी संयोजन केले. अभिजित शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घावटे यांनी आभार मानले.