‘खडसेंच्या विरोधातील प्लान दिल्लीतला; राज्यातील नेत्यांमध्ये ती ताकद नाही’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Eknath-Khadse-Prithviraj-Chavan.jpg)
पुणे | ‘ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य करण्यात आले असून, भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वामध्ये असे करण्याची ताकद नाही,’ अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपमधील अंतर्गत वादावर खोचक टिप्पणी केली. खडसेंसारखा लोकनेता काँग्रेसमध्ये आला, तर त्याचा पक्षासाठी फायदा होईल, असेही ते म्हणाले.
विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे यांनी संतापून राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. त्यावरून खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बराच कलगीतुराही रंगला होता. त्यावेळी खडसे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सहाव्या जागेची ऑफर असल्याच्या गौप्यस्फोट केला. त्यावर खडसे काँग्रेसची विचारधारा स्वीकारत असतील, तर त्यांचे निश्चित स्वागत करू, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिली होती.
त्या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ऑनलाइन वार्तालाप कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसे यांना लक्ष्य करण्यामागे भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप केला.