ऐन उन्हाळ्यात टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना बंद, वीजबिलाची वाढली थकबाकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/4tembhuwater_2.jpg)
सांगली – जिल्ह्याच्या दुष्काळी भागात दुष्काळाच्या झळांनी लोकांचे जगणे असह्य होत आहे. जिल्ह्यातील टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या सिंचन योजना ऐन उन्हाळ्यात सध्या बंद आहेत. योजनांच्या थकबाकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी भागासाठी सिंचन योजना वरदान आहेत. राज्य सरकारने विजबिलासाठी 81 टक्के सरकार आणि 19 टक्के लाभार्थी असे प्रमाण ठरवून दिले तरीही थकबाकी कमी होत नसल्याचे विदारक चित्र आहे.
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळाल्याने बागायती क्षेत्र कायम राहिले आहे. 2002 पासून बागायती क्षेत्रही काही प्रमाणात वाढल्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना दिलासा मिळाला आहे. थकित बीलापोटी तिन्ही योजना सातत्याने बंद राहिल्या. थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले होते. टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणीयोजना कार्यक्षेत्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांचा समावेश आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून रक्कम मिळाल्याने योजनांची बीले भरल्याने योजना सुरु राहिल्या.
ताकारीची 50 कोटी थकबाकी आहे. योजनेची थकबाकी वसूल होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वसुली झाली तरच पंपांची देखभाल दुरुस्तीसह पोटकालव्यांची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. ताकारी सिंचन योजना कारखान्यांकडून मिळणाऱ्या पाणीपट्टीवर अविरतपणे सुरु होती. अन्य योजनांप्रमाणे ही योजना बंद पडत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळते. टप्पा एक आणि दोनवरील पंपाव्दार कडेगाव, तासगाव, खानापूर आणि वाळवा तालुक्यातील गावांना पाणी दिले जाते.
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेत म्हैसाळ योजनाही 20 दिवसांसाठी बंद ठेवली आहे. दुसऱ्या टप्प्यातील सहा पंप नादुरुस्तीने बंद आहेत. अपुऱ्या आणि नादुरुस्त पंपासह म्हैसाळ योजनोचे आवर्तन सुरु ठेवणे शक्य नाही. गेल्या चार महिने म्हैसाळ योजनेचे 141 दिवस आवर्तन सुरु होते. पाचही टप्प्यात काही विद्युत मोटारी आणि पंप दुरुस्त्या निघाल्या आहेत. अकरा पंपापैकी पाच ते सहा पंप अचानक नादुरुस्त झाले
टेंभू योजनेचीही थकबाकीचा प्रश्नही भेडसावत आहे, त्यामुळे योजनेचे पाणी बंद आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे, त्यामुळे सिंचना योजना तात्काळ सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.