एमआयडीसीकडून विस्कळीत पाणी पुरवठा, नागरिकांनी घेतला धसका
- महापालिका पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
- निगडी गावठाण परिसरातील नागरिक चिंतेत
पिंपरी – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रशासनाकडून महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने लोकांचे हाल होत आहेत. लोकप्रतिनिधींनी विचारल्यास एमआयडीसी प्रशासन पाणी कपात करण्याची भिती घालत आहे. त्यासंदर्भात एमआयडीसीने पत्र पाठविले असताना त्याला पालिकेने आजतागायत उत्तर दिलेले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे एमआयडीसीकडून होत असलेल्या पाणी कपातीमुळे निगडी भागातील नागरिकांनी धसका घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड पाणी पुरवठा योजनेतून महापालिकेच्या हद्दीतील भागाला विविध व्यासाच्या 12 नलिका जोड दिल्या आहेत. त्याद्वारे प्रतिदिन 30 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. निगडी गावठाण, केएसबी चौक, बजाज ऑटो, मोरवाडी, भोसरी संप, गवळी माथा, लांडेवाडी आदी भागाला पाणी दिले जाते. येथील सुमारे दहा हजार नागरिक एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यातच गेली कित्येक दिवसांपासून एमआयडीने कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत एमआयडीसीकडे विचारणा केल्यास विविध कारणे सांगितली जात आहेत. शहराच्या ठरावीक टप्प्यातील बगीचे, उद्यान, रोप वाटीका, बांधकाम आदींना पाण्याचा वापर होत असल्याचे समोर आल्यानंतर एमआयडीसी आणि पालिका यांच्यात 8 नोव्हेंबर 2017 रोजी पत्रव्यवहार झाला होता. त्यानुसार पालिकेने मैला शुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी बगीचे, उद्यान, रोप वाटीका, बांधकाम आदींना वापरल्यास पिण्याचे पाणी बचत होईल, असे पालिकेला सूचित केले होते. मात्र, पालिकेने आजतागायत ही बाब गांभिर्याने घेतलेली नाही.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक आणि चाकण औद्योगिक क्षेत्रात वाढीव पाण्याची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी एमआयडीसी धडपड करत आहे. पालिकेने मैला शुध्दीकरण केंद्रातील पाण्याचा वापर केल्यास पिण्याचे पाणी बचत होऊन ते पाणी औद्योगिक क्षेत्राला पुरवठा करता येईल. मात्र, पालिकेने एका शब्दानेही एमआयडीसीला याबाबत कळविलेले नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्यात काटकसर करावी, अन्यथा पाणी पुरवठ्यामध्ये नाईलाजाने कपात करावी लागेल, अशा सक्त सूचना देखील पालिकेला दिल्या आहेत. मात्र, पालिकेने त्यावर कसलीच भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे एमआयडीसीकडून होत असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पाणी कपातीसंदर्भात एमआयडीसीचे पत्र आले आहे. त्यांच्या सूचनेनुसार पाणी पुरवठा काटकसरीने केला जाईल. पाण्याचा कसलाही अपव्यय होत नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पत्राला उत्तर देण्यात येणार आहे. नागरिकांचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही.
विशाल कांबळे, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग
निगडी गावठाण व लगतच्या भागातील सुमारे 2 हजार घरांना एमआयडीसीचा पाणी पुरवठा होतो. गेली कित्येक दिवस विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक भयभित झाले आहेत. एमआयडीसीकडे विचारणा केली असता 8 नोव्हेंबर 2017 चे पत्र दाखविले जाते. त्याला पालिकेने कसलेच प्रत्युत्तर दिले नसल्यामुळे पाणी कपात केली जात असल्याची भिती नागरिकांच्या मनात आहे.
सचिन चिखले, गटनेता, मनसे