आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान; नववधू-वराच्या नवीन आयुष्याची सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1-4.jpg)
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|
विवाहानंतर सासरी येताच आयोजित स्वागत समारंभाची सुरुवात नव वधु-वरांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना साडीचोळी भेट देऊन, त्यांचा सन्मान करून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. हा उपक्रम ‘आधार माणुसकीच्या’ माध्यमातून अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथे साकार झाला.
अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पुणे येथील उद्योजक व्यंकटराव शिंदे यांचे सुपुत्र निखिल याचा विवाह पुणे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार यांची मुलगी ऐश्वर्या हिच्याशी झाला.विवाहाप्रीत्यर्थ मंगळवारी भारज येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्वागत समारंभाची सुरुवात नवदाम्पत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १५० विधवांचा सन्मान करून केली. या सर्व महिलांना साडीचोळीचा आहेर भेट देण्यात आला. तसेच या सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/79efc08c7a57c991eb47eb085e5729bd.jpg)
विवाहावर लाखो रुपयांची उधळण, आतिषबाजी व विविध माध्यमांतून केली जाते. समाजात शुभकार्यात विधवांना दूर ठेवले जाते. मात्र, शिंदे व पवार कुटुंबियांनी आपल्या या नवीन वधूवरांची आयुष्याची सुरुवात सामाजिक बांधिलकी जोपासून केली. यावेळी भव्य समारंभ घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे भाजपाचे गटनेते एकनाथराव पवार, भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ, अंबाजोगाईचे तहसीलदार संतोष रूईकर, उपनगराध्यक्षा सविता लोमटे, ज्योती शिंदे, अशोकराव कदम, संयोजक व्यंकटराव शिंदे, शिवाजी शिंदे, वसंत शिंदे, आधार माणुसकीचा चे अध्यक्ष अॅड. संतोष पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.