…आता पत मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल – बाबा कांबळे
- आंबेडकर जयंतीनिमित्त अन्नदान, मिठाई वाटप
- महाराष्ट्र रिक्षा पंचायतचा उपक्रम
पिंपरी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना घटनेच्या रूपाने सामाजिक समता न्याय स्वतंत्र बंधू आणि एक व्यक्ती एक मत मिळवून दिले. यामुळे कष्टकरी जनतेला मताचा अधिकार मिळाला. परंतु, आता पत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.
निगडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा थांबा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अंकित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा थांबाच्या वतीने निगडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बाबा कांबळे यांच्या हस्ते अन्नदान, मिठाई वाटप आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बबन मिसळ, नाना गाडे, राजेश शिंगरे आदी उपस्थित होते. यावेळी बाबा कांबळे यांच्या हस्ते या भागातील कार्यकर्त्यांचा आणि चांगले काम करणाऱ्या रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.
कांबळे म्हणाले की, रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ व्हावे. यासाठी आम्ही लढा दिला. सरकारने कल्याणकारी महामंडळ करण्याची घोषणा केली. यामुळे रिक्षा चालकांना समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे. गोरगरीब जनतेला प्रतिष्ठा मिळावी. यासाठीचा हा संघर्ष आहे.