आठवले, जानकरांपुढे मुख्यमंत्र्याचा हा प्रस्ताव, बघा काय तो?
सोलापूर – ‘तुम्हाला पाहिजे त्या मतदारसंघात तुमच्या पक्षाचे स्वत:चे मेळावे घ्या, लाखोंची गर्दी जमवून दाखवा, मगच तुम्हाला ते मतदारसंघ सोडण्याचा विचार केला जाईल,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महादेव जानकर व रामदास आठवले यांच्यापुढे ठेवल्याची चर्चा आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिवसेना आणि आता वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांसह अन्य पक्ष, संघटनांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांच्या संघटनासाठी नेत्यांनी गावोगावी बैठका घेण्यात सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता लाखोंची गर्दी जमवायची कशी, असा पेच जानकर आणि आठवले यांच्यापुढे निर्माण झाल्याची चर्चा आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने रिपब्लिकन पक्षाला दिलेली आश्वासने न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
जानकर यांनी धनगर आरक्षणासाठी सरकार दरबारी काहीच हालचाली केल्या नसल्याची भावना समाजात आहे. त्यामुळे बहुतांशी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्धार करत अन्य पक्षांची वाट धरल्याची चर्चा आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत आता या दोन्ही नेत्यांचा जनाधार घटल्याने दोन्ही नेत्यांची भूमिका अद्यापही तळ्यात-मळ्यातच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.