अबब… पुण्यात तब्बल 2 कोटी 10 लाखांचे अमली पदार्थ जप्त, आठशे 68 किलो गांजा, साडेसात किलो चरस
पुणे: आंध्र प्रदेश येथून महाराष्ट्रात विविध ठिकाणी होणाऱ्या गांजा आणि चरसच्या तस्करीचे रॅकेट सीमा शुल्क विभागाने (कस्टम) विभागाने उद्ध्वस्त केले आहे. कस्टम विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ट्रकचा पाठलाग करून ८६८ किलो गांजा आणि साडेसात किलो चरस जप्त केले आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल २ कोटी १० लाख रुपये असल्याची माहिती सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली आहे.
आंध्र प्रदेशातील ग्रामीण भागातून महाराष्ट्रातील विविध भागांत अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यानुसार कस्टम विभागाचे पथक अशा तस्करीवर बारीक लक्ष ठेवून होते. नलदुर्ग-सोलापूर रोडवर सोलापूर येथील बोरामणी गावाजवळ त्यांना बुधवारी (दि.२४) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोन संशयित ट्रक आढळून आले होते. कस्टम विभागाने ट्रकचा बोरामणी गावापासून पाठलाग केला होता. ते ट्रक पुण्यात आल्यानंतर त्याला अडवण्यात आले होते. ट्रकची तपासणी केली असता त्यांना ट्रकच्या टपावर १ कोटी ४ लाखांचा ८६८ किलो गांजा आणि दुसऱ्या ट्रकमधून साडेसात किलो वजनाचे ७५ लाखांचे चरस आढळून आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २ कोटी १० लाख असल्याचे कस्टम विभागाने सांगितले आहे.