अफवांमुळे निष्पापांचे जीव जातात, पुण्यात गणेश मंडळाचे फ्लेक्सद्वारे प्रबोधन
अफवांमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते, यामुळे निष्पापांवर जीव गमावण्याची वेळही येऊ शकते. अशा अफवा आजकाल सोशल माध्यमांमुळे सहज वेगाने पसरतात. त्यामुळे सोशल माध्यमांवर येणारे हे संदेश रोखण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशा आशयाचे प्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या एका फ्लेक्सने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवारी धुळ्यात अफवेतून ५ जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर हा फ्लेक्स लावण्यात आला आहे.
पोरं चोरणारी टोळी आली आहे, बाळाने पिन गिळली आहे, टेंभुर्णी जवळ अपघात घडला, इम्रान खानची गोळ्या झाडून हत्या झाली, रेल्वे स्टेशनवर लहान मुलगा सापडला आहे, यांसाऱख्या सहानुभूती आणि भिती निर्माण करणाऱे अनेक मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवरुन व्हायरल होत आहेत. या गोष्टी पुढे पाठवणे बंद करा, कारण अफवा पसरवणे गुन्हा आहे, अशी माहिती असलेला फ्लेक्स पुण्यातील लक्ष्मी रोडवर श्री गरुड गणपती मंडळाने लावला आहे. या मार्गाने जाणारे लोक काही काळ या फ्लेक्ससमोर थांबून मजकूर वाचून पुढे जात आहेत.
लहान मुलांना पळवून नेणारी टोळी असल्याच्या समजुतीतून धुळ्यातील राइनपाडा गावात रविवारी पाच जणांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. यात त्यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला होता. व्हॉट्सअपवरील व्हायरल मेसेजमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर गोंधळ निर्माण करणारे व्हायरल मेसेज पुढे पाठवू नयेत. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.