येडीयुराप्पा मुख्यमंत्री पद सोडणार; नव्या मुख्यमंत्र्याबाबत म्हणाले, ‘सायंकाळपर्यंत समजेल’
![Yeddyurappa to step down as CM; Said about new CM, 'will understand by evening'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/8657yirgvbjhdfyt56467_202107658977.jpg)
कर्नाटकमध्य़े मुख्यमंत्री बदलाचे वारे वेगाने वाहू लागले असून आज सायंकाळपर्यंत नवीन मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे खुद्द मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा यांनीच संकेत दिले आहेत. यामुळे येडीयुराप्पा मुख्यमंत्री पदावरून पायऊतार होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
नवीन मुख्यमंत्री कोण असेल याच्या नावाची घोषणा आज सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. दिल्लीच्या हायकमांडकडून हे नाव येणार आहे, असे येडीयुराप्पा म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु झाले होते. तेव्हा काही नेत्यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होती. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या बंडाळीमुळे भाजपाने दुसऱ्या नेत्याला नेतृत्व देण्याचा निर्णय पक्का केला आहे.
I'm expecting suggestions from high command by evening, you'll (media) also come to know what it will be. High command will decide about it, I'm not concerned about it (on appointing Dalit CM): Karnataka CM BS Yediyurappa pic.twitter.com/dJ0xhQUPTo
— ANI (@ANI) July 25, 2021
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण?
2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. तर आता निरानी यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे नाव चर्चेत आहे. यामुळे या दोघांपैकीच मुख्यमंत्री होणार की लिंगायत समाजाचा नेता सोडून अन्य कोणत्या समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री पद मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे.
येडीयुराप्पांच्या तीन अटी…
येडीयुराप्पा हे गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. दोन दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यात येत त्यांनी 26 जुलैरोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. आज दिल्लीतून आदेश येताच उद्या येडीयुराप्पा बैठकीत राजीनामा देण्याची शक्यता आहे.येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत.