एक पैसाही न घेता गट ड ची परीक्षा पुन्हा घेणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
मुंबई | प्रतिनिधी
आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवरून विधानपरिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केली. ते म्हणाले, कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणे आवश्यक होते. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जो काही प्रकार घडला तो नैतिक नव्हता. कुंपणाने शेत खाल्ल्याचे समोर आले आहे ते आता दुरुस्त करणार आहे. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. गट ड ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेणार, असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली. प्रवीण दरेकर म्हणाले, म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळले जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले. तर गट क साठी १५ लाख रुपये आणि गट क साठी ८ लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिप मध्ये समोर आहे. अमरावतीमध्ये २०० विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केला.
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, या सर्व प्रकरणाची निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करणार आहोत. न्यासा कंपनी हायकोर्टात गेली होती. त्यानंतर न्यासाचे सिलेक्शन करण्यात आले. आरोग्य विभागाने पाच लोकांना कळले. पाच कंपन्यांकडून डेमो घेतला. आरोग्य आय़ुक्त, सार्वजनिक आरोग्य सचिवांनी परीक्षा घेतली, असे टोपे यावेळी म्हणाले.