Amol Kolhe : खासदारकीचा राजीनामा देणार का? अमोल कोल्हे म्हणाले..
पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यानंतर त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यानंतर खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचंही ते म्हणाले. याबाबत विचारलं असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, मी माझ्या राजीनाम्याबाबतची अस्वस्थता लिखित स्वरूपात शरद पवारांना कळवली. त्यावर शरद पवारांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी मला आठवण करून दिली की, शिरूर मतदारसंघातील मायबाप मतदारांनी ५ वर्षासाठी निवडून दिलं आहे. अनेक कामं मार्गी लागलेले आहेत आणि अनेक कामं मार्गी लागत आहेत. असं असताना या मतदारांनी दाखवलेल्या विश्वासावर आपण ठाम राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातील तरूणाईचा लोकशाही प्रणालीवर आणि लोकशाहीतील मुल्यांवर, राजकारणातील नैतिकतेवर विश्वास रहावा म्हणून महाराष्ट्रभरात फिरायला हवं.
हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल; म्हणाले..
मी माझी भावना, अस्वस्थता शरद पवारांसमोर मांडली. आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, घडामोडी बघितल्या, तर राजकारणातील नैतिकता, विश्वासार्हता, उत्तरदायित्व या सगळ्याच गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मी शरद पवारांना एक पत्र दिलं आहे. त्यात हीच भूमिका मांडली ती, मी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करत आलो आहे. त्यामुळे ३५० वर्षे अस्तित्वात असलेलं स्वराज्य निर्माण केल्यानंतरही त्याला रयतेचं राज्य म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श ठेऊन मी राजकारणात अलो, असं अमोल कोल्हे म्हणाले.
आताच्या परिस्थितीत विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना फसवल्यासारखं वाटतंय ही अस्वस्थता मी मांडली. तसेच शरद पवार यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं. हे मी लिखित स्वरुपात त्यांना दिलं. यावर शरद पवारांनी मला हीच अस्वस्थता महाराष्ट्रातील तरुणाईची आहे, असं सांगितलं. तसेच त्यांचा लोकशाही प्रणालीवर विश्वास बसावा म्हणून काम करणं गरजेचं असल्याची आठवण करून दिली, असंही अमोल कोल्हे म्हणाले.