राज ठाकरे एकनाथ शिंदेंना का भेटले? कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? मनसे प्रमुखांनी केला खुलासा

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिंदेंचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘नंदनवन’ येथे झालेल्या भेटीची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. इतकेच नाही तर या भेटीनंतर शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा त्यांच्यातील युतीची चर्चा रंगू लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आता स्वतः राज ठाकरे यांनी या भेटीत एकनाथ शिंदे यांच्याशी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.
मनसेच्या पक्षांतर्गत बैठकीनंतर राज ठाकरे माध्यमांसमोर आले असता त्यांना एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या बैठकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याबद्दल माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, “आपल्याकडे पूर्वीसारखे निकोप राजकारण राहिलेलं नाही. कोणीही एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येकवेळा त्यामध्ये काहीतर राजकारण शोधायचं आणि त्यातून युत्या-आघाड्या…. एक तर तीन वर्षांनी निवडणूका आहेत. आता तर तशी काही परिस्थिती नाहीच. दुसरी गोष्ट म्हणजे, आता निवडणुका संपलेल्या आहेत, आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही सजेशन द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करवून घ्यायच्या असतील तर भेट व्हायला नको? प्रत्येकवेळी त्यात काहीतरी राजकारणच शोधलं पाहिजे याची काही अवश्यकता नाही. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटेन…,” असे राज ठाकरे म्हणाले.
आज मुंबई, पुणे, ठाणे अशा अनेक शहरांमध्ये, शहरांचे आणि राज्याचे अनेक प्रश्न आहेत, जे आम्हाला वाटतात ते सांगणे गरजेचे नाही का? तुम्ही त्या दिवशी असतात तर त्याच दिवशी कशासाठी भेटलो हे सांगितलं असतं, असेही राज ठाकरे माध्यम प्रतिनिधींना बोलताना म्हणाले. राज ठाकरे आण एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर संभाव्य युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
हेही वाचा – दहावी परीक्षेबद्दल बोर्डाचा अत्यंत मोठा निर्णय, थेट दहावीची परीक्षा आता वर्षातून…
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी मनसेने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. ज्यावरुन उद्धव ठाकरेंनी नाराजीही व्यक्त केली होती. तसंच राज ठाकरेंनी याबाबत बोलणं टाळलं होतं. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी राज ठाकरे अचानक कसे काय पोहचले? याची चर्चा आता चांगलीच रंगली होती.
शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते नरेश म्हस्के यांनी देखील सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट केली होती. ‘काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली.. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला… परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल’, असे म्हस्के म्हणाले.
मला आपल्या शहरांची रोजची परिस्थिती इतकी बिकट आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. त्यातील मत्त्वाचा भाग आपण बघत नाहीत. आपल्याकडे विकास म्हणजे रस्ते बांधण, फ्लायओव्हर बांधणं, पूल बांधणं याला आपण प्रगती म्हणतोय. पण मला असं वाटतं की ती सूज आहे, ते काही बाळसं धरलेलं नाहीये, असे राज ठाकरे म्हणाले.
आज मुंबई, ठाणे, पुणे आणि सर्वच शहरांमध्ये सगळीकडे रीडेव्हलपेंट सुरू आहेत. जिथे २५ ते ४० माणसं राहत होती आज तेथे जवळपास ४०० लोकं राहत आहेत. जागा तेवढीच आहे, रस्ते तेच आहेत. आज अनेकांकडे अनेक गाड्या आहेत. त्या पार्किंगमध्ये न जाता रस्त्यावर उभ्या राहातात, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी शिस्त राहिली पाहिजे. आज रस्ते ट्राफिकसाठी तयार नाहीयेत, सगळीकडे कोंडी होऊन बसलेली आहे. हा सगळ्या शहरांचा प्रश्न आहे. शहरांमध्ये येणारी माणसे आणि गाड्या थांबत नाहीयेत. हे सगळं प्रकरण आपण कुठे नेणार आहोत? मागे हीच गोष्ट मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितली होती, तीच गोष्ट मी त्यांच्या (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) कानावर घातली, असे राज ठाकरे म्हणाले.




