भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शिवबंधन बांधणारे कोण आहेत हिरे?
![Who are the diamonds who are building the Shivbandhan of the Shiv Sena of the Thackeray group by leaving the BJP?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/adwait-Hire-780x470.jpg)
मुंबई : अद्वय हिरे हे सत्ताधारी पक्षातून म्हणजे भाजपमधून ठाकरे यांच्या शिवसेनेत आले आहेत. आज त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशाबद्दल बोलताना अद्वय हिरे म्हणाले, जेव्हापासून शिंदे गट भाजपमध्ये आला तेव्हापासून भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपत स्थान उरले नाही. सन्मानाची वागणूक दिली जात नाही. मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहील. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्तेचा प्रयत्न केला. तरीही भाजपनं आंदोलनाची भूमिका समजून घेतली नाही, अशी खंत अद्वय हिरे यांनी व्यक्त केली.
मालेगावात होणाऱ्या प्रकल्पामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण, भाजप त्यांची बाजू समजून घेत नाही. उद्धव ठाकरे यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी माझ्यासह घेतली असल्याचं अद्वय हिरे यांनी टीव्ही ९ मराठीच्या स्टुडियोत मुलाखत देताना सांगितलं.
तशी गद्दारी मी करणार नाही
शेतकऱ्यांची भूमिका मांडत होतो तेव्हा मला समजून घेण्यासाठी वेळ नव्हता. आता माझी भूमिका समजून घ्यावीसी का वाटते, असा सवाल अद्वय हिरे यांनी भाजपला विचारला. ५० गद्दार ज्या पद्धतीनं भाजपच्या हाती लागले तशी गद्दारी मी करणार नसल्याचं हिरे म्हणाले. कितीही आमिष भाजपनं दिलं तरी मी भाजपमध्ये परत जाणार नाही. सत्तेसाठी, पैशासाठी बाप बदलणारी माझी औलाद नाही, असंही हिरे यांनी ठणकावून सांगितलं. हिरे म्हणाले, दादा भुसे यांच्या विरोधात शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढणार आहे. उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग मालेगाव तालुक्यात आहे. त्यांच्याच बळावर गद्दार आमदार झाले होते, असा घणाघातही हिरे यांनी केला.
कोण आहेत अद्वय हिरे?
अपूर्व आणि अद्वय हिरे यांचे मालेगावात मोठं काम आहे. ते भारतीय जनता पक्षात होते. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रातलं हिरे कुटुंब राजकारणातं मोठं कुटुंब आहे. भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांत हिरे हे फार मोठी परंपरा राजकारणात आहे. अद्वय हिरे हे तरुण पिढीचे नेते राजकारणात आहेत. ते भाजपतून शिवसेनेत आले.