राज ठाकरेंच्या पुण्यातील मेळाव्यात सर्वात मोठा प्रश्न कोणता? दीपाली सय्यद यांनी उडवली खिल्ली
मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा नुकतीच केली. तसंच रविवारी पुण्यात होणाऱ्या जाहीर सभेत मी यावर सविस्तर भाष्य करेन, असं राज यांनी सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
‘अयोध्या दौरा रद्द करून कोणताच मुद्दा शेवटपर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज ठाकरे यांनी कायम ठेवली, त्याबद्दल आम्हाला खंत आहे. मात्र पुण्यातील मनसेच्या मेळाव्यात वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का, हा त्यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल की नाही?’ अशा आशयाचं खोचक ट्वीट दीपाली सय्यद यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची दीपाली सय्यद यांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही दिवसांपासून त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय झाल्या असून मनसे आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. प्रामुख्याने राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे दोघे दीपाली सय्यद यांच्या निशाण्यावर आहेत.
- ‘नातेवाईकांच्या जिवावर कोणी स्वयंघोषित हिंदुजननायक नसते’
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेपासून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मशिदीवरील भोंग्यांवरून मनसेने राज्यभरात आंदोलनही केले होते. तसंच अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. या मुद्द्यावरूनही दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला होता. ‘हिंमत असेल तर महाआरती ज्ञानवापी येथे करून दाखवा. अयोध्येचे श्रेय बाळासाहेबांचे आहे, तेथे उपकारांचा भोंगा कसा वाजवाल ? स्वत:चे अस्तित्व बनवावे लागते, नातेवाईकांच्या जिवावर कोणी स्वयंघोषित हिंदुजननायक नसते,’ असा टोला सय्यद यांनी लगावला होता.