निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांनी पाच वर्षात काय कामे केली!
आढळराव पाटलांची टीका..? संजय राऊतांचा उल्लेख करत अमोल कोल्हे यांची घेतली फिरकी
![What did the gossipers of loyalty do in five years?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Amol-kolhe-2-1-780x470.jpg)
पुणे : संपुर्ण देशात एव्हाना राज्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होतांना दिसत आहे. अशातच एका पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा उल्लेख करत अमोल कोल्हे यांच्यावर आढळरावांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.
शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत. अशी टिका आढळरावांनी कोल्हेंवर केलीय. यातच मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात काय कामं केलीत ते त्यांनी दाखवावे ? असं म्हणत आढळरावांनी थेट अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिलंय.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, शिरूरच्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. मात्र, त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले, की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात काय काम केले. हे दाखविता येत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला. तर मी खासदार असताना केलेल्या कामांची उद्घाटने कोल्हे करीत आहेत. पाच वर्षात ते मतदारसंघात फिरकले नाहीत. मात्र त्यानंतरही निवडणुक लढविताना त्यांना लाज वाटत नाही. अशी टिका देखील त्यांनी केली.