‘आपण लढणारे, पुन्हा जिंकू’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विखे पाटलांना कानमंत्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-35-780x470.jpg)
Eknath Shinde : सुजय नाराज होऊ नको, आपण लढणारे आहोत, पुन्हा लढू, पुन्हा जिंकू,आपण लढणारे आहोत, रडणारे नाहीत, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना कानमंत्र दिला.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक, जळगाव आणि नगर जिल्ह्यात बैठका घेतल्या. लोणी येथील झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी सुजय विखेंना कानमंत्र दिला. तसेच किशोर दराडे यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बैठकीला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. नाशिकला पालखी असल्याने वेळ गेला. मला कुठे बोलावलं की मी जात असतो. मी सर्वसामान्य मुख्यमंत्री आहे. सहकाराचे बीज रोवण्यात विखे कुटुंबाची भूमिका महत्वाची आहे. लोकसभेतील निकालावरून आपल्याला काही बोध घेण्याची निश्चित गरज आहे. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर खोटं नेरेटीव्ह केल्याने आम्हाला फटका बसला. मोदी हटाव बोलले, पण ते म्हणणारेच हटले. काही जागांवरून बोध घ्यावा लागेल.
हेही वाचा – पुण्यात पुन्हा हीट अँड रन! आमदाराच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
शिक्षण व शिक्षकांचं योगदान सर्वात मोठं आहे. आपले उमेदवार किशोर दराडे अभ्यासू आहेत. दराडे यांच्या पाठीशी उभे राहा व त्यांना निवडून द्या. शिक्षकाचा सन्मान केला पाहिजे म्हणून आपण जुनी पेन्शन योजना सुरू केली. मात्र त्याला विरोध झाला. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही निश्चित काम करणार आहोत. दुधाचा निर्णय आम्ही घेतला. काही ठिकाणी अंमलबजावणी झाली तर काही ठिकाणी नाही झाली. मात्र आता आगामी काळात कॅबिने मध्ये याबाबतीत निर्णय घेतला जाईल. शिक्षकाला फक्त शिकविण्याचे काम मिळाले पाहिजे यासाठी आम्ही सकारात्मक आहोत.
सुजय नाराज होऊ नको, आपण लढणारे आहोत, पुन्हा लढू, पुन्हा जिंकू,आपण लढणारे आहोत, रडणारे नाहीत, आम्ही जिंकलो तिथे मशीन हॅक केले आणि ते जिंकले ते योग्य झाले, असे कुठं असतं. हा तात्पुरता व आसुरी आनंद विरोधकांना घेऊ द्या. विधानसभेत त्यांना समजेल आम्हीच सत्तेवर येऊ. प्रत्येक निवडणुकीतून शिकलं पाहिजे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.