युपीमधील गंगेतील मृतदेहांची आपल्याकडे चर्चा झाली पण बीडमधील २२ मृतदेहांच्या विटंबनेची चर्चा झाली नाही: देवेंद्र फडणवीस
![We have discussed the bodies of Ganga in UP but we have not discussed the desecration of 22 bodies in Beed: Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Devendra-Fadanvis-on-beed-incidence-.jpg)
मुंबई |
महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशात गंगेतून वाहून गेलेल्या ५० मृतदेहांची चर्चा झाली पण बीडमध्ये एका व्हॅनमध्ये कोंबून भरलेल्या २२ मृतदेहांची चर्चा झाली नाही, असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यामध्ये प्रचार करण्यासंदर्भातील एक यंत्रणा उभारण्यात आली असून त्या माध्यमातून काम केलं जात असल्याची टीका करताना फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि बीडमधील घटनेची तुलना केली. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने उभारलेल्या या प्रचारकी यंत्रणेला इकोसिस्टीम असं म्हटलं.
महाराष्ट्र सरकार रोज सकाळी एखादी खोटी किंवा दिशाभूल करणारी बातमी सोडून ती इकोसिस्टीमच्या माध्यमातून वाजवते असा आरोप फडणवीस यांनी केलाय. मात्र समाज माध्यमांवर सर्वात मोठी इकोसिस्टीम भाजपाची असतानाच महाराष्ट्र सरकारच्या या इकोसिस्टीमला उत्तर देण्यास भाजपाची इकोसिस्टीम कमी पडली का?, असा प्रश्न लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारला असता भाजपावर कितीही टीका करु शकता. समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमे भाजपावर हवी तेवढी टीका करु शकतात, त्यासंदर्भात कुठलीच अडचण नाहीय. मात्र शिवसेनेच्याविरुद्ध, मुख्यमंत्र्यांच्याविरुद्ध किंवा महाराष्ट्र सरकारच्या विरोधात एक जरी पोस्ट टाकली तरी नोटीस देण्यात येते. आमच्या १० हजार कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे नोटीस देण्यात आल्या आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.