आम्ही घरं वसवतो उद्ध्वस्त करत नाही- राणे
- नारायण राणे यांचे प्रतिपादन
सावंतवाडी |
राज्यातील आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्राने व्हॅक्सीन दिले मात्र टेंडर मागणाऱ्याला बोलावून युवराजांनी १२ टक्कय़ांची मागणी केली. आज व्हॅक्सिन नाही म्हणून लोक मरत आहेत. मात्र त्यांना केवळ पैसा हवा आहे. आयएस, आयपीएस बदल्यांसाठी २५ कोटी घेतले जात आहेत. यालाच ठाकरे सरकार म्हणतात. आम्ही कधी बदल्यांसाठी पैसे घेतले नाहीत, आम्ही लोकांची घरं वसवली, उद्ध्वस्त केली नाहीत. त्यामुळे उगाच आम्हाला धमकावण्याचे काम करू नका. मी भारतीय जनता पक्षात आहे त्यामुळे अवघं कोकण भाजपमय करण्याचं माझं काम आहे. आगामी निवडणुकीत कोकणातील सर्व खासदार,आमदार हे भाजपचेच असतील, असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी शहरात उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना जनतेच्या प्रेमाने भारावून गेलेल्या नारायण राणे यांनी ‘माझ्यावर प्रेम करणारी अशी माणसं लाभली हे माझं भाग्य आहे.’ अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. सिंधुदुर्गातील जनता नेहमीच माझ्या पाठीशी राहिली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता मला विरोध करणार नाही. एक आमदार आव्हान देत होता पण माझ्या यात्रेत जवळपासही कुठे दिसला नाही. एवढय़ा मोठय़ा जनसमुदायासमोर येण्याचे धाडसही करू शकणार नाही. तुमचा तो पिंड नाहीय. आम्हाला धमकावणी चालत नाही उगाचच तसा प्रयत्नही करू नका, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता विरोधकांचा समाचार घेतला. माइक नसल्याने आवाज कमी येतोय, माइकमध्ये आवाज खणखणीत जातो व बऱ्याच लोकांच्या कानात तो खणखणीत पोहोचतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर,यात्रा संयोजक तथा माजी आमदार प्रमोद जठार, नगराध्यक्ष संजू परब आदी उपस्थित होते.