उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची; जावेद अख्तर यांनी केलं कौतुक
![Uddhav Thackeray's popularity surpasses that of Mamata Banerjee and Stalin; Appreciated by Javed Akhtar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Javed-Akhtar-Uddhav-Thackeray.jpg)
मुंबई |
उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रातील लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणत्याही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत अशा शब्दांत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. आपल्या आरसएस आणि भाजपासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे झालेल्या गदारोळावर जावेद अख्तर यांनी सामनात लेख लिहून मौन सोडलं आहे. यावेळी त्यांनी कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नाही असं सांगत कौतुक केलं.
“एकीकडे हिंदू उजव्या विचारसरणीचे समर्थक माझ्यावर चिडलेले असताना एका प्रमुख राजकीय नेत्याने आपल्या महाविकास आघाडी सरकारला तालिबाने म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या ती पक्षांच्या आघाडीचे महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही. आज महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करत असल्याचा आरोप करु शकत नाहीत. असे असताना कोणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबाने कसे व का म्हणू शकले हे मला तरी उमगलेले नाही,” असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.
- जावेद अख्तर यांनी लेखात काय म्हटलं आहे –
“मी जेव्हा 3 सप्टेंबर 2021 रोजी ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील. एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे. मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण सर्वप्रथम मला माझ्या उपरोल्लेखित मुलाखतीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे,” असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.
“माझ्या टीकाकारांनी म्हटले आहे की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही. त्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा आरोप केला आहे. मला याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही की, गेल्या काही वर्षांत मी काय काय केले आहे याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. कारण मी काही इतकाही महत्त्वाचा माणूस नाही की मी काय करतोय किंवा काय करत होतो हे प्रत्येकाला माहिती असावे,” असा उपहासात्मक टोला जावेद अख्तर यांनी लगावला आहे.