शिंदे गटातील मंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा सल्ला म्हणाले आधार देतायत की गाढतायत यावर विचार करा…
![Uddhav Thackeray's advice to Shinde group ministers: Think whether you are giving support or deepening...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Udhav-Thakre-1.jpg)
नागपूरः यंदाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गटातील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहरे आले. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही १५० कोटींचा घोटाळ्यांचा आरोप झाला आहे. त्यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांचीच प्रकरणे बाहेर येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना मोलाचा सल्ला देताना म्हटलं आहे की, ‘ज्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत त्यांनीच विचार केला पाहिजे की हे आपल्याला आधार देतात की गाढतात.’ मात्र, उद्धव ठाकरेंचा रोख नक्की कोणावर हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड पुकारले. शिवसेनेसोबत फारकत घेऊन शिंदेंनी भाजपासोबत हातमिळवणी केली. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आलबेल असल्याचं चित्र रंगवलं गेलं. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. तसंच, अधिवेशनात शिंदे गटातील मंत्र्यांचेच घोटाळे बाहेर येत आहेत, हे घोटाळे बाहेर कसे येतात आणि का येतात यावर विचार करण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
‘फक्त शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणे कशी बाहेर येतात हा विचार त्यांच्या गटातील मंत्र्यांनीच केला पाहिजे. आमच्या काळातही प्रकरण बाहेर आलं होतं. मात्र, त्या प्रकरणात माझा काही पाठिंबा नव्हता. ज्यावेळी आरोप झाला तेव्हा एका मंत्र्याचा मी राजीनामाही घेतली. आताही त्यांचं प्रकरण बाहेर आलं आहे. त्यामुळे ज्यांची प्रकरणं बाहेर येतात त्यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला हे आधार देतात गाढतात,’ असं उद्धव ठाकरे आज म्हणाले.
शिंदे गटाची बुभूक्षित नजर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरातील रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातील डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आता हे लोक आरएसएसवरही ताबा मिळवतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. आरएसएस हा मजबूत आहे त्यामुळे ते ताबा मिळवू शकत नाहीत, मात्र आरएसएसने आता सावध राहायला हवं, असंही मिश्किलीत म्हटलं आहे.