‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ३३ देशात गद्दार म्हणून ओळख; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू - उद्धव ठाकरे
मुंबई : बारसूतील रिफायनरीवरून राज्यात मोठा वाद सध्या सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिक लोकांकडून आणि विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध केला जात आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू.
मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस, बल्कड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते. मात्र, हे सर्व प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आणि आता वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं मी होऊ देणार नाही. आपल्याच जनतेला नुकसान पोहोचवून हे सरकार विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आज मी कोकणात मन की बात करायला आलेलो नाही, तर जन की बात ऐकायला आलो आहे. शिवसेना ही बारसूतील लोकांच्या पाठिशी आहे. दर येथील लोकांना रिफायनरी नको असेल तर काहीही झालं तरी इथे रिफायनरी होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना ३३ देशात गद्दार म्हणून ओळख झाली आहे. आमच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांना महाराष्ट्रातले तीन जिल्हेसुद्धा ओळखत नव्हते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.