डोनाल्ड ट्रम्प रोज खिल्ली उडवत आहेत; उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Uddhav Thackeray | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जुलै २०२५ रोजी २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी काल अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी जे टॅरिफ लागू केलं आहे त्याबाबत प्रश्न विचारला असता त्यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे सध्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, की ट्रम्प टॅरिफचा फटका सामान्यांना बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली उडवत आहेत. आपण त्यांना अवाक्षरानेही उत्तर देत नाही. देशाचं सरकार नेमकं चालवतंय कोण? मी माझं मत आधीही व्यक्त केलं आहे आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज आहे. कारण आत्ताचे पंतप्रधान हे भाजपाचे आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही मोदी बिहारला गेले, पहलगामला नाही. या सरकारकडे परराष्ट्र नीती वगैरे काही नाही, खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारत असताना डोवाल रशियाला गेले आहेत. पंतप्रधान चीनला चालले आहेत. चीन बरोबरचे संबंधही त्यांच्या मित्रासाठी दरवाजे उघडतात का? पण हे सगळं होत असलं तरीही परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत हे सरकार सपशेल अपयशी ठरलंय.
हेही वाचा : ‘जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा’; उपमुख्यमंत्री अजित पवार
उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला? तसंच राजीनामा दिल्यानंतर ते आहेत कुठे? यावर चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक राज्याच्या निवडणुका जेव्हा होत आहेत तेव्हा होणार. बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला त्यात अंतिम निर्णय काय झाला माहीत नाही. पण मतदाराची ओळख त्याने पटवून द्यायची असं काहीतरी ठरल्याचं कळतं आहे. देशात अघोषित एनआरसी लागू झालाय का? हा प्रश्न यामुळे निर्माण होतो आहे. सीएए आणि एनआरसीचा विषय गाजला होता तेव्हा आंदोलनं झाली होती. तेव्हाही हाचा मुद्दा होता. आता निवडणूक आयोगाने याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.





