उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवार यांची भेट; उद्धव ठाकरेंनी सांगितलं भेटीमागचं कारण..
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार पासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये किरीट सोमय्या प्रकरणाचा मुद्दा गाजल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी बोगस बियाण्यांच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. तसंच त्यांनी अजित पवार यांचं कौतुकही केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मी त्यांना दिल्या. सध्या जी काही सत्तेची साठमारी चालली आहे त्यात राज्यातील प्रश्न महत्वाचे आहेत. पाऊस सुरू झाला आहे, पूर स्थिती आहे. शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झाला होता, आता कदाचित अतिवृष्टीमुळे हवालदिल होईल. मात्र सत्तेची साठमारी सुरू आहे अशात जो मूळ आपला शेतकरी आहे, राज्याचा नागरिक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंतीही मी अजित पवार यांना केली आहे.
हेही वाचा – ‘चिपळूणसह जिल्हात खबरदारी, मदतकार्याच्या उपाययोजना करा’; अजित पवारांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
अजित पवार हे अडीच वर्ष माझ्या बरोबर होते. मला खात्री आहे की सत्तेचे डावपेच इतर लोकांकडून सुरू असले तरीही अजित पवारांकडून जनतेला मदत होईल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत परत त्यामुळे हे शक्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जनतेला सगळं समजतं आहे. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे या वाक्याचा पुनरूच्चारही उद्धव ठाकरेंनी केला. अजित पवार शरद पवारांना दोन दिवस का भेटले? असा प्रश्न विचारला असता त्यावर आमची काहीही चर्चा झाली नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.