“….तर आम्ही सोडणार नाही”; नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेवरुन शिवसेनेचा इशारा
![then we will not give up"; Shiv Sena's warning from Narayan Rane's Jana Aashirwad Yatra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/rane-shivsena.jpeg)
मुंबई |
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला होता. शिवसेना भाजपा संघर्ष, राणेंना अटक, जामीन, सुटका या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर आजपासून राणे यांची थांबलेली जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होत आहे. यावरुनच आता शिवसेनेने राणेंना इशारा दिला आहे. शिवसेनेचे आमदार राजन साळवी याबद्दल म्हणतात, “उद्धव ठाकरेंबद्दल जे विधान केलं, त्यामुळे आम्ही भडकलो.
आम्ही पक्षप्रमुखांच्या विचाराने प्रभावित झालेली मंडळी आहोत. त्यांच्याबद्दल असं विधान कोणीही केलं तरी ‘अरे’ला ‘का रे’ आम्ही करणार. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याप्रमाणे भाजपाने ही यात्रा काढली आहे. यात्रा काढावी त्यात काही दुमत नाही. पण यावेळी आमच्या शिवसेनेबद्दल असं वक्तव्य केलं तर शिवसेना सोडणार नाही, अशीच भूमिका आहे. ते पुढे म्हणाले, “आज पुन्हा एकदा जन आशीर्वाद यात्रा सुरु होत आहे. त्यांनी पूर्ण करावी, त्यावर आमचा काही आक्षेप नाही. पण जर आमच्या शिवसेनेवर, नेत्यांवर, पक्ष प्रमुखांवर काही बोलणार असाल तर नक्कीच सोडणार नाही. उत्तर देणं ही शिवसेनेची भूमिका असून तीच कालही होती आणि उद्याही राहणार आहे. १०० टक्के ‘अरे’ला ‘का रे’ करणार असून ते करुन दाखवूच”.