…तर मोदी सरकारही पडू शकते- अण्णा हजारे
पारनेर |
भारतीय जनता पक्ष, काँग्रेस अथवा इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून देशाला उज्ज्वल भवितव्य मिळण्याची शक्यता नाही. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते सत्ता, सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा सत्ता याच्यामागे लागले आहेत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी जनतेचे संघटन (जनसंसद) आवश्यक आहे. मजबूत जनसंसदेशिवाय देश वाचणार नाही असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. झोपलेली जनता जागी झाली तर नरेंद्र मोदी सरकारही पडू शकते असा इशारा हजारे यांनी दिला आहे.
भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यकत्र्यांचे एकदिवसीय शिबीर राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात बोलताना हजारे यांनी देशाच्या सद्य:स्थितीवर हे परखड भाष्य केले. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले. १४ राज्यातील कार्यकर्ते शिबिरास उपस्थित होते. हजारे म्हणाले की, सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकारवर कायमस्वरूपी अंकुश ठेवण्यासाठी ‘जनसंसदे’चा दबाव गट असणे आवश्यक आहे. २०११ साली जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी मजबूत संघटनांची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून चमू तयार करण्यात आला होता. मात्र नंतर हा गट फुटल्याची खंत व्यक्त केली.