राज्यात आज वाजणार निवडणुकीचा बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा अपेक्षित

पुणे | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आता अखेर संपणार असल्याचे संकेत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज, मंगळवारी (४ नोव्हेंबर) सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा वेग वाढवला. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, महापालिकांच्या प्रभाग आणि महापौरांच्या आरक्षणाची घोषणा या महिन्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत द्या, अन्यथा उडवून देऊ; काँग्रेस खासदाराचा मोदी–फडणवीस सरकारला इशारा
तीन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता
पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्चता आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नगरपालिकांसाठी २१ दिवसांचा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ३० ते ३५ दिवसांचा, तर महापालिकांसाठी २५ ते ३० दिवसांचा निवडणूक कार्यक्रम ठरवला जाण्याची शक्यता आहे. या निवडणूक कार्यक्रमात अधिसूचना प्रसिद्ध करून अर्ज भरण्यापासून ते मतदान आणि निकाल जाहीर होण्याचा कालावधीचा समावेश आहे.




