‘मी पुन्हा येईनचे स्वप्न अजूनही जिवंत’; फडणवीसांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर
![‘The dream of coming again is still alive’; Rohit Pawar's reply to Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Rohit-pawar-Devendra-fadnavis1-1.jpg)
मुंबई |
परमबीर सिंग यांनी बदलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं. गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आलेल्या या पत्रामुळे राज्यात खळबळच उडाली. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा आक्रमक झाली. फडणवीसांकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सरकारवर आरोप केले जात असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवारांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीसांसह भाजपा आणि परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल शंका उपस्थित केली आहे. “अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल. गृहमंत्री महोदयांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला, यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचं प्रतीत होतं,” असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.
“गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत, ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं,” असा टोलाही रोहित पवारांनी भाजपाला लगावला आहे.
“संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी. राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स. काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी, या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं. एखाद्या व्यक्तीला पदावरून काढल्यानंतरच ती झालेल्या गैरकारभाराबद्दल बोलू लागते म्हणजे गैरकारभार झालाय की पदावरून गेल्याचं दुःख आहे, हा प्रश्नही महत्वाचा आहे,” असा प्रश्न रोहित पवार यांनी परमबीर सिंग यांच्या पत्राबद्दल उपस्थित केला आहे. “हातात अधिकार असताना काहीही न बोलणारे पदावरून हटवताच बेछूट आरोप करत सुटतात, याचा अर्थ काय समजावा? आज हा अधिकारी दिल्लीत कोणाला भेटला? नंतर सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी का करतो? तो स्वतः बोलतोय की कुठली राजकीय शक्ती एखाद्या राजकीय हेतूपोटी या अधिकाऱ्याकडून हे सगळं वदवून घेतेय, अशी शंका निर्माण होत आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
वाचा- …तेव्हा गुजरात सरकार बरखास्त का केलं नाही?; खासदार संजय राऊतांचा सवाल