महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करा: भाजपा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात
![Take measures to prevent atrocities against women: BJP chief spokesperson Amol Thorat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-16-at-1.49.43-PM.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे. यासंदर्भात थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगारांना कोणाचाच धाक वाटेनासा झाला आहे. अनेक महिला अत्याचार होऊनही पोलिस चौकीत जायला घाबरतात त्यांच्यासाठी कॉल सेंटर उभारण्याची गरज आहे.मदतीसाठी व्हाट्सअप नंबरही दिला गेला पाहिजे त्यामुळे महिला महिलांशी बोलतील त्यांना संकोच वाटणार नाही. गुन्ह्याची माहिती देण्यासाठी 100 नंबर तसेच ॲम्बुलन्स रुग्णवाहिके साठी एकशे आठ नंबर आहे त्याच धर्तीवर महिलांना मदतीसाठी एखादा नंबर दिला गेला पाहिजे .असे झाल्यास गुन्हे घडण्या आधीच ते रोखले जाऊ शकतील. गुन्ह्याचे लोकेशनही समजू शकेल.
मात्र, राज्यात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना राज्यातील महा विकास आघाडी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप थोरात यांनी केला आहे
महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद कारवाई करता यावी आणि गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार शक्ती कायदा करणार असल्याचे सांगितले गेले होते .मात्र अद्याप त्या दिशेने पावले पडलेली नाहीत. महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्तीही केली गेलेली नाही. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन महिन्यापूर्वी पत्र लिहून महिला आयोग अध्यक्ष नियुक्तीची गरज प्रतिपादन केली होती मात्र महिला आयोगाचे अध्यक्षपद महा विकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यापैकी कोणाला द्यावे यावरून महाविकास आघाडीत घोळ सुरू असल्याचे समजते .मात्र यात राज्यातील महिला भरडल्या जात आहेत त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करावी तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी थोरात यांनी केली आहे.