‘आमच्या नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा काय होतं’; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक

Supriya Sule | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते आणि खासदार नारायण राणे एकाच वेळी किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असता मोठा राडा झाला. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखून धरलं होतं. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, कायदा आणि सुव्यवस्था काय करते आहे तिथे. पोलिस यत्रंणा काय करत आहे. पोलिसांची यत्रंणा आहे ना तिथे. आमचे सर्व नेते जाणार हे आधीच सर्वांना माहिती होतं. जयंत पाटील यांच्यासोबत तेथील स्थानिक नेते तिथे जाणार होते ते माहिती होतं ना. त्यांनी काल दिवसभर माध्यमांनी सांगितलं होतं. मग सरकारचं इंटेलिजन्स काय करत आहे. गृहमंत्र्यांनी शांततेचं अपील केलं पाहिजे. मी बारामतीत आहे, मला जास्त काही माहिती नाही. नेमकं काय सुरू आहे. पण माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी सर्वांना अपील केलं पाहिजे. शांतता राखून त्यातून मार्ग काढला पाहिजे. काल आमचे नेते जाणार हे सर्वांना माहिती होतं. मग पोलीस आणि बाकीची यत्रंणा काय करत होती. आमच्या सर्व नेत्यांनी सुरक्षितता आणि जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची आहे. आमच्या कोणत्याही नेत्यांच्या केसाला धक्का बसला तर बघा काय होतं, अतिशय चुकीच आहे.
हेही वाचा – राजकोट किल्ल्यावर ठाकरे विरुद्ध राणे मध्ये जोरदार राडा, जोरदार घोषणाबाजी
राजगडावर नेमकं काय घडलं?
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अज राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही सहभाग होता. मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे देखील राजकोट किल्ल्यावर आले. मात्र, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील, विनायक राऊत हे किल्ल्यावर गेलेले असल्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांना राजकोट किल्ल्यावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. त्यामुळे नारायण राणे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यानंतर नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राणे यांचे समर्थक आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक होत ते बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना निघायला सांगा, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनीही किल्ल्यावर काहीवेळ ठिय्या आंदोलन केलं. तसेच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरादार घोषणाबाजी केल्यामुळे काहीवेळ राजकोट किल्ल्यावर ताणाव निर्माण झाला होता. मात्र, यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करत समजूत घातली. यानंतर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, जयंत पाटील हे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले.





