ठाकरे गटाला दिलासा, चिन्हासाठी समता पक्षाने केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/delhi-hight-Court.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचा वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र, या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली असून समता पक्षाची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी म्हटले आहे की, पक्षाची मान्यता 2004 मध्ये संपुष्टात आल्यापासून समता पक्षा चिन्हावर अधिकार सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. समता पक्षाची स्थापना 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी केली होती.
समता पार्टीने ”धगधगती मशाल” या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, जॉर्ज फर्नांडिस यांनी 1994 मध्ये समता पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर 1996 मध्ये निवडणूक आयोगाने ”धगधगती मशाल” हे चिन्ह दिले होते. नंतर समता पार्टीचे हे निवडणूक चिन्ह काढून घेतले, असे सांगत ठाकरे गटाला हे चिन्ह दिले. आता निवडणूक आयोगाकडे ”धगधगती मशाल” चिन्ह मिळावे, यासाठी ई-मेल केला असल्याचे त्यांनी सांगितले. मशाल चिन्हामध्ये साम्य असल्याने मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतरांना न देण्याची विनंती करण्यात आली आहे.