मुंबई पोलीस आयुक्तांनी चित्रा वाघ यांच्यावर कार्यवाही करावी; राज्य महिला आयोगाची मागणी
चित्रा वाघ यांच्याकडून माझ्या जिवाला धोका; उर्फीचे महिला आयोगाला पत्र, सुरक्षा पुरवण्याची मागणी
मुंबई : अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेदवरून राज्यात सुरू असलेला वाद शमण्याचे नाव घेत नाही आहे. अशातच आता उर्फी जावेद हिने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रितसर तक्रार अर्ज दाखल केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, असं उर्फीने म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,”मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा वाघ यांनी केवळ स्वत: च्या राजकीय फायद्याकरिता किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती प्रसिद्धीकरिता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसार माध्यमांद्वारे दिल्या आहेत. चित्रा वाघ यांचे राजकीय व्यक्तित्व असल्याने त्या किंवा त्यांचा प्रभाव असलेली व्यक्ती अथवा व्यक्ती समुहाकडून माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांच्या धमकीमुळे मला घराबाहेर पडतानाही भिती वाटत आहे, म्हणुन प्रकरणाची दाहकता निवळेपर्यंत सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी अर्जदार उर्फी जावेद हिने महिला आयोगाकडे केली आहे.
मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा, अशी मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.