‘राज आणि उद्धव वेगळे होऊ नयेत म्हणून मी खूप प्रयत्न केले’; स्मिता ठाकरेंचं विधान
मुंबई | राज ठाकरेंनी बाळासाहेब हयात असतानाच शिवसेनेतून वेगळं होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतःचा पक्ष सुरु केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांपासून वेगळे झाल्याची अनेक कारणं आहेत. मात्र त्यांनी वेगळं होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले असं स्मिता ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. स्मिता ठाकरे या बाळासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्या पत्नी होत्या. कालांतरानं त्यांनी घटस्फोट घेतला. सध्या त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सक्रिय आहेत.
स्मिता ठाकरे म्हणाल्या की, शिवसेनेची जी काही अवस्था झाली आहे ती पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला यातना होत असतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा एकमेकांपासून वेगळे होत होते तेव्हा मी त्या दोघांना थांबवण्याचा, समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काही गोष्टी खूप खोलवर गेलेल्या असतात, ज्या मनात राहतात. तसंच अनेकदा काहींचे उद्देश असेच असतात की आम्हीच वारसदार आहोत. ही वृत्ती ज्याच्या डोक्यात आहे तोच स्वतःला वारसदार म्हणवतो. मग इतर लोकांचं महत्व त्यांना राहात नाही. अशा वृत्तीने कुणी चालणार असेल तर पक्ष एकसंध कसा राहिल? असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा – ‘देवेंद्र फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार’; आमदार रविंद्र धंगेकर
“Sharad Pawar is a real politician…(Bala)Saheb used to see him as a friend”- Smita Thackeray on the rapport between two Maharashtra leaders#ANIPodcastwithSmitaPrakash #Balasaheb #SharadPawar #NCP
Watch Full Episode Here: https://t.co/N1iCJJOIQx pic.twitter.com/5VwICNo9XS
— ANI (@ANI) February 20, 2024
बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते की ते मला राज्यसभेवर पाठवतील. माझं काम पाहून त्यांनी मला वचन दिलं होतं की तुला राज्यसभेवर पाठवेन, पण तसं घडलं नाही कारण यामागे कोण होतं हे मी सांगणार नाही. सगळ्यांना आतून माहीत होतं की मी राजकारणात यावं. काही गोष्टी अधोरेखित असतात, असं स्मिता ठाकरे म्हणाल्या.
माँ (मीनाताई ठाकरे) जेव्हा गेल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे खूप भावनिक झाले होते. मी तेव्हा त्यांच्यासोबत होते. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काय झालं ते मला माहीत नाही. आम्ही (मी आणि बाळासाहेब) या विषयावर कधी बोललोही नाही. मी कायम त्यांच्याकडून जितकं चांगलं शिकता आलं तेवढं मी शिकले. माझं आणि त्यांचं नातं गुरू शिष्याचं आहे. मी आज जे काही शिकले आहे ते सगळं बाळासाहेबांमुळेच शिकले आहे, असंही स्मिता ठाकरे म्हणाल्या.