‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा १०० टक्के प्रचार केला नाही’; श्रीरंग बारणे
पुणे | लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. आता ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केला आहे.
श्रीरंग बारणे म्हणाले की, मावळच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. या मतदारसंघात पनवेल आणि पिंपरी चिंचवड शहर ही दोन मोठी महानगरं आहेत. याठिकाणी महायुतीला मानणारा मोठा वर्ग आहे. याठिकाणी उबाठा गटाची ताकद नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात पडलेल्या ३ लाख २२ हजार मतांपैकी मला दोन लाख मतं पडतील. पनवेल विधानसभा मतदारसंघात १ लाख ८० हजार मतदान पडले. या दोन मतदारसंघांमध्ये मिळालेला लीड समोरचा उमेदवार तोडू शकणार नाही.
हेही वाचा – बारावीचा निकाल जाहीर; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी
अजित पवार यांनी मावळमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. अजितदादा गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं. पण काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. याची लिस्ट मी अजित पवारांकडे दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी १०० टक्के काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते, असंही श्रीरंग बारणे म्हणाले.