‘कोल्हेंनी फक्त नावाला गावे दत्तक घेतली, त्या गावांना सोयीसुविधा मी पुरवतोय’; आढळराव पाटलांची टीका
पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघातून काल महायुतीने मोठं शक्तिप्रदर्शन करत शिवाजीराव आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. यावरून विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर टिका केली. त्यावर आता आढळरावांनी कोल्हेंवर पलटवार करत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवाजीराव आढळराव पाटील यांना नव्हे तर छगन भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचा प्लॅन होता. मात्र त्यांनी नकार दिल्याने आढळरावांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री गैरहजर राहिले. त्यावरून शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी आहेत की डॅडी आहेत. असा सवाल कोल्हेंनी केला.
हेही वाचा – ‘कितीही रडीचे डाव खेळा, येणार तर दणकून येणार अन् जनतेतून येणार’; खासदार डॉ. अमोल कोल्हे
कोल्हेंनी केलेल्या टिकेवर शिवाजीराव आढळराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी समजून घ्यावं की डमी ते असतील आणि डॅडी मी आहे. साधारण पाहता अमोल कोल्हेंनी शिरूर मतदारसंघातील अनेक गावं दत्तक घेतली आहे. या दत्तक घेतलेल्या गावात सोयी सुविधा नाही. मात्र मी कोणालाही न सांगता माझ्या संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा करतो आणि गावात सोयी सुविधा देतो. गावं नुसते दत्तक घेऊन होत नाही. सोयी सुविधा देखील पुरवाव्या लागतात. त्यांनी दत्तक घेतलेल्या गावातदेखील मी पाणी पुरवठा करत आहे’, असं आढळराव पाटील म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून शिरूरमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार शाब्दिक वार होतांना दिसत आहे. एका उमेदवाराने आरोप केलेत की दुसरा उमेदवार लगेचच त्याला प्रत्युत्तर देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिरूरमध्ये राजकीय वातावरण आता चांगलचं तापत असल्याचे दिसून येत आहे.