धर्मवीर की स्वराज्यरक्षक वादावर पहिल्यांदाच बोलले शरद पवार
![Sharad Pawar spoke for the first time on the dispute between Dharmaveer and Swaraj Rakshak...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/sharad-Pawar.jpg)
मुंबईः राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान केलं होतं. अजित पवार यांच्या विधानानंतर राज्यात भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली. तसंच अजित पवार यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आलं. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी चुकीचं नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. ठाण्यात काही नेत्यांची नावं धर्मरक्षक अशी दिसून येतात. धर्मवीर काय किंवा धर्मरक्षक काय ? ज्यांना धर्मवीर म्हणायचं त्यांनी धर्मवीर म्हणावं, ज्याला स्वराज्य रक्षक म्हणायंच त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं. राज्याचं रक्षण करण्याचं त्यांनी महत्त्वाचं काम केलं त्याची नोंद आपण घेतली तर त्याची नोंद घेतल्यास चुकीचं नाही. त्याच्यावरून वाद करण्याची गरज नाही. महापुरुषांवरून अकारण वाद नको असेही शरद पवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर मात्र शरद पवार यांनी बोलणं टाळलं. अजित पवार अधिवेशनात बोलले ते मी ऐकलं. पण इतरांवर बोलण्याची गरज नाही असं म्हणत शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्याच्या प्रश्नाला बगल दिली. तसंच अजित पवार यांनी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावर ते लवकरच त्यांची भूमिका मांडतील असं शरद पवार म्हणाले.
लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांचे मोर्चे निघतायत यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, देशातली सत्ता त्यांच्याकडे आहे, राज्यातली सत्तासुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कायदा करण्याच्या मागणीसाठी मोर्चाची काय गरज आहे. सत्ता आहे तर लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन टाकावा. त्याला कोणाचा विरोध नाही.