अजित पवारांच्या ‘त्या’ आरोपावर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, अजित पवार कुठून..
मुंबई | राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत अजित पवार यांनी टीका केली आहे. तुमचे वय झाले असून तुम्ही बाजूला होऊन तरूणांना संधी द्यावी, असं अजित पवार म्हणाले. यावरून शरद पवार यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते सोलापूर येथे माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, मी तरुणांना संधी देत नाही. मग अजित पवार कुठून आले आणि त्यांना कुणी आणलं. त्यांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं आणि असं किती लोकांबद्दल सांगू.. याकडे फार लक्ष द्यायचं नाही. मी कधीही हुकूमशहा प्रमाणे वागलो नाही. मी आपसात चर्चा करून निर्णय घेतो.
हेही वाचा – इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी उघडणार शेअर बाजार, वाचा सविस्तर..
पंतप्रधान नरेद्र मोदी सोलापूर येथे आका कार्यक्रमात बोलताना भावूक झाले. यावरून शरद पवार यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगारी, महागाई या दोन प्रश्नांचा कुठेतरी ओझरता उल्लेख केला असता, तर अधिक बरं झालं असतं. पण मुळ प्रश्नावरून लोकांना बाजूला नेण्याची कामगिरी त्यांनी केल्याचे दिसून आले.
सोलापूर जिल्ह्याचे रोजगारासंबंधीचे काही प्रश्न आहेत. औद्योगिकीकरणासाठी इथे प्रयत्न व्हायला पाहीजेत. सोलापूर ही एकेकाळची औद्योगिक नगरी होती. जुन्या काळातील कारखाने बंद पडले. सोलापूरातील ४० ते ५० हजार तरूण आज पुण्यात काम करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांना बाहेर जावे लागत असेल तर त्याबद्दल विचार केला पाहीजे. या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज होती. पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. पंतप्रधान आले, मुख्यमंत्री आले, पण त्यांच्या येण्याने इथल्या लोकांच्या पदरात काय पडले? हे पाहणे महत्त्वाचे ठरते, असंही शरद पवार म्हणाले.